काल सकाळची गोष्ट. आमचा पेपरवाला प्रसन्न झाल्यामुळे “सकाळ” अगदी सकाळी सकाळी येउन पडला होता. आणि रात्री उशीरा झोपल्यामुळे, माझी दोन वर्षाची मुलगी पण अजुन उठलेली न्हवती. फ़ारा दिवसाने योग आल्यामुळे नीवांत सकाळ पहायला मिळाला. त्यातच एका बातमीने लक्ष वेधुन घेतलं.
भारताच्या मा. राष्ट्रपती यांची भारतीय विमान दलातील अद्ययावत “सुखोई” विमान प्रवासासाठी जय्यत तयारी.
लागलीच मी ही बातमी “ही”ला वाचुन दाखवली.
“म्हणजे राष्ट्रपती स्वतः विमान चालवणार आहेत का?” ….आमची ही.
“नाही. नाही. बसणार आहेत. ह्या विमानाचा वेग ताशी ९०० किमी इतका जाऊ शकतो. अशा विमानात वयाची ७५री पार केलेल्या राष्ट्रपती प्रवास करणार आहेत.” ..मी
“कशासाठी?”…… ही.
’सॅनिकांचे मनोधॅर्य वाढवण्यासाठी’, असं उत्तर देण्याच्या विचारात होतो, पण परत आणखी प्रश्न निर्माण होण्याच्या भितीने मी ह्या प्रश्नाला “वेल लेफ़्ट” केले. 😉
“पुण्यातुन उड्डाण होणार आहे.”…. मी.
“हो का.. कुठे जाणार आहेत?”… ही.
“हं! बहुतेक पुण्यातुन पुण्यात परत. पुण्यात सुखोई चा तळ आहे.” … दाढी करण्याच्या निमित्ताने पुढील चर्चा मीच आवरती घेतली.
—————————————————————————–
आहो पण राष्ट्रपती आणि सफ़रचंदाचा काय संबंध?
सांगतो सांगतो.. सगळं सांगतो.
आज ऑफ़िस मधुन निघताना फ़ोन केला तर, जर चांगली मिळाली तर येताना सफ़रचंद घेऊन ये…. ही
साधारण कितीला असतात…. मी – श्रीमंती फ़ळं विकत घेण्याची सवय नाही. पण सध्ध्या घरात कन्या, आई आणि बाबा असे तीन पेशंट असल्यामुळे, लेट तर लेट – An Apple a Day – Keeps Doctor Away साठी सफ़रचंद घेण्यचे धाडस करण्याचे मी ठरवले.
औंधहुन कोथरुडला येताना, पाषाण रस्त्यावर, NCL कॉलिनी तुन बाहेर आल्याआल्या रस्त्याच्या डाव्या बाजुला एक मोठा फ़ळांचा स्टॉल आहे. एकदा-दोनदा केळी आणि स्वस्तं झाल्यावर सिताफ़ळं घेतली असतील, पण मराठीतुन गप्पा मारल्यामुळे चांगली ओळख झाली आहे. आज पाहिलं तर स्टॉलचा मिनी-स्टॉल झाला होता. दोनचारंच प्रकाराची फ़ळं, ती ही अगदी थोडीथोडी.
काय हो. आज लवकर बंद काय? आणि माल काहिच नाही. मार्केट ला जायला विसरलात की काय? – मी
नाही. राष्ट्रपती येणार आहेत ना. – श्री. फ़ळवाले
मग? बाजारतली सगळी फ़ळं तिकडे गेली? — मी.
नाही. पोलिसांनी सांगितल की ३ दिवस दुकान बंद ठेवा. – श्री. फ़ळवाले
का ? – मी.
राष्ट्रपती येणार आहेत ना पुण्याला. विमानात बसायला. – श्री. फ़ळवाले
—————————————————————————–
कोण म्हणतो, सरकार आणि सामान्य जनता यात संबंध उरला नाही?
राष्ट्रपतींच्या पुण्यनगरी आगमनाने, कित्त्येक सामान्य नागरिकांच्या सामान्य दिनमानावर फ़रक पडतो तो असा.
केवळ जगण्यावरच न्हवे…..
मा. पंतप्रधानांच्या भेटीसाठी कडक झालेल्या सु्रक्षाव्यवस्थे्मुळे वेळीच इस्पितळात प्रवेश करु न शकल्यामुळे एका अत्याव्यस्थ रुग्णाला आपले प्राण देखील गमवावे लागले ही बातमी आपल्या लक्षात असेलचं.
आम्ही मात्र खुश आहोत. कदाचित मा. राष्ट्रपतींच्या भेटीमुळे, आमच्या नेहमीच्या रस्त्यावरचे खड्डे बुजण्याची शक्यता आहे.